हिंस्र बिबट्या असणारा भाग म्हणून उत्तर पुणे जिल्ह्याची वन विभागाकडे नोंद


शेतावरच्या मानवीवस्त्यांनाच हिंस्र प्राण्याचा धोका
विविध घटनेने हिंस्र वन्य प्राण्यांचा विषय ऐरणीवर
स्वसंरक्षण प्रशिक्षण लोकांना देण्याची गरज

चाकण: अविनाश दुधवडे

अतिगजबजाटाच्या चाकण पासून जवळचा भाग असणाऱ्या भोसे( ता.खेड)गावामध्ये हिंस्र वन्य प्राण्याच्या हल्ल्यात आदिवासी ठाकर समाजातील शेतमजूर संतोष ज्ञानोबा
जाधव (वय 30 वर्षे )ठार झाला.या घटनी पूर्वी याभागातील शेतकऱ्यांच्या काही शेळ्या मेंढ्याही वन्य प्राण्यांनी फस्त केल्या होत्या.त्यामुळे हा वन्य प्राणी म्हणजे बिबट्याच
असावा असा नागरिकांचा कयास असला तरी वन विभागाने यास दुजोरा दिला नाही.मात्र दोन वर्षांपूर्वी याभागातील रस्त्यावर बलदंड बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता.
त्यामुळे बिबट्याचा वावर असण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे.भोसे गावातील घटने मुळे शेतावरच्या मानवीवस्त्यांना हिंस्र प्राण्यांनी आपले मुख्य लक्ष्य बनविले असल्याचे
पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.त्यामुळे वन विभागाची हद्द ओलांडून मानवी वस्ती कडे धावणाऱ्या बिबट्या अथवा कुठलाही हिंस्र वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्यावर त्याला कसा
जेरबंद करायचा,स्वसंरक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षणही लोकांना देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये सर्वांत जास्त मार्जार कुळातील देखणा पण हिंस्र बिबट्या असणारा भाग म्हणून उत्तर पुणे जिल्ह्याची वन विभागाकडे नोंद आहे. या भागात असणाऱ्या
वनसंपत्तीमुळे त्यांचे वास्तव्य या परिसरात आहे. बिबट्याने मानवी वस्ती कडे धाव घेतल्यानंतर आता त्याचा यापुढे कसा बंदोबस्त करता येईल याची नुसतीच चर्चा मोठ्या
प्रमाणात होत आहे. वन विभागाला वन्य जीव महत्त्वाचा आहे. मात्र, त्यांचे माणसांवर होणारे हल्लेही गंभीर बाब आहेत. असा एखादा वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्यावर
त्याला कसा जेरबंद करायचा याचे प्रशिक्षणही लोकांना नाही. त्यामुळेच अशा जिवांचा नाहक बळी जात आहे. त्यासाठी त्याच्या उपाययोजनांचीही गरज आहे.

बिबटे बहुतांश वेळा मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व मनुष्यवस्तीतील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत
घुसण्याच्या हल्ले करण्याच्या पाळीव प्राणी मारण्याच्या शेकडो घटना या भागात वारंवार घडतात हे गेल्या काही वर्षात प्रकर्षाने समोर आले आहे.
वन्यप्राण्यांबाबत प्रत्येक नागरिकाने संवेदनशील असले पाहिजे, ही प्राणिमित्र संघटनांची मागणी वाजवी असली, तरी याबाबत निश्‍चित असे धोरण आखण्याचीदेखील आता वेळ
आलेली आहे. बेसुमार नागरीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी माणूस आपल्या र्मयादा सांभाळून होता. जोवर जंगलांवर माणसानं अतिक्रमण केलं नव्हतं तोवर बिबटे, हरिण,
काळवीट आणि मोरांचा कधी उपद्रव जाणवत नव्हता. त्यामुळे या प्राण्यांविषयी शेतकर्‍यांच्या मनामध्ये एकप्रकारचा कळवळा होता; परंतु अलिकडच्या काळात वन्यप्राण्यांमुळे
होणारी पिकांची नासाडी बघून शेतकरीदेखील त्यांच्यामागे हात धुऊन लागले असल्याचे दिसून येते. विशेषत: बिबट्यांबाबत घडलेल्या अलिकडच्या घटना पुरेशा बोलक्या आहेत.

मुळात जंगलांना खेटून शहरे वसली आणि मग शहर आणि गावांनजीक मोठय़ा प्रमाणात जंगलतोड झाली. त्यातून सैरभैर झालेले हे प्राणी खाद्य आणि आसर्‍यासाठी
मनुष्यवस्तीत शिरू लागले. त्यातून मनुष्यवस्त्यांवरील त्यांचे हल्लेदेखील वाढले. तसे मार्जार कुळातील हे बिबटे महाराष्ट्रात अधिक प्रमाणात आढळतात. बिबटे, बिबळे आणि
वाघरू अशा नावांनी संबोधला जाणारा हा प्राणी मुख्यत: मनुष्यवस्तीजवळ राहणेच पसंत करतो. शेळ्या-मेंढय़ा, कुत्रे आणि गायींची वासरं हे त्याचं मुख्य खाद्य.
स्वभावत: भित्रा असल्याने आडोशाला दबा धरून हिंस्त्र हल्ला करतो. अलिकडच्या काळात शेतावरल्या मानवीवस्त्यांना बिबट्यांनी आपले मुख्य लक्ष्य बनविले आहे.
त्यामुळे धोका वाढला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये गेल्या काही वर्षात बिबट्यांनी हैदोस घातला आहे. दिवसाढवळ्या लहान मुलांवर हल्ले करून अनेकांना
जायबंदी केले आहे. तर काही बिबटेही गतप्राण झाले. बिबट्याच्या दहशतीने अनेक लोकवस्त्या गेल्या काही वर्षांपासून पासून जगसुद झोपत आहेत. बिबटे आणि नागरिकांचा हा
संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. हल्लेखोर बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची सक्षम यंत्रणा वन विभागाकडे नाही. गावकर्‍यांचा पाठलाग चुकवत विहिरीत पडलेल्या
बिबट्यांना जिवंत विहिरीबाहेर काढण्यासाठी लागणारे पिंजरे त्यांच्याकडे नाहीत. नैसर्गिक पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रत्येक जीव आपल्या परीनं मोलाची भूमिका बजावत
असतो. त्यामुळे अनावश्यक संघर्ष टाळला पाहिजे असे या वन्य प्राण्यांच्या समस्येशी झुंजणाऱ्या नागरिकांसह प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे.
------------------------------------------------------------------------------------
अविनाश दुधवडे, ९९२२४५७४७५ / ९७६५५६६९०८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वैदू समाजातील महिलांच्या पारंपारिक व्यवसायाला घरघर